गुरु शिष्यांची भेट
त्या दरम्यान चर्चगेटजवळ पारश्यांच्या विहीरीवर श्री साटम महाराज बसले असतांना त्यांची बाबा रेहमान यांच्याशी भेट झाली. तेव्हा बाब महाराजांना म्हणाले जो प्रकाश मे बापने मुझे दिखाया, वो मुझे दिखाने के लिए मुझे इधर मेरे बापने भेजा है. असे बोलून त्यांना आपल्यातील ईश्र्वरी तेज महाराजांच्या शरीरात सोडले त्यानंतर महाराज डोंगरीला बाबांच्या दर्शनास जात असत. सध्या असलेल्या डोंगरी पोलीस ठाणे येथील टेकडीवर पूर्वी बाबांची बैठक होई त्या बैठकीलाही महाराज जात असत. कधी कधी आपल्या लाडक्या शिष्याच्या भेटीला बाबा जात असत. बाबांकडून अनुग्रह घेतल्यानंतर महाराजांनी तपश्चर्येसाठी पूर्ण भारत देशभर भ्रमंती सुरू केली. त्यानंतर आपले कार्य सुरू केले ते करत करत ते दाणोलीला स्थायिक झाले. अशाच एके दिवशी दाणोलीत साटम महाराज खूप रडू लागले. भक्तांनी रडण्याचे कारण विचारले असतांना ते म्हणाले आज माझा गुरू गेला. त्यानंतर थोड्याच वेळात रेहमान बाबांनी देह सोडल्याची खबर मुंबईहून तेथे पोहोचली. २७ डिसेंबर १९१६ रोजी त्यांनी देह सोडला. त्यांचे वय अंदाजे १२५ वर्षांचे होते.
बाबांची दर्गाह (तांडेल स्ट्रिट, छत्री सारंग मोहल्ला, डोंगरी) व बैठक (डोंगरी पोलीस ठाणे)
बाबांच्या इच्छेप्रमाणे छत्री सारंग मोहल्ला (जिथे बाबा नेहमी बसत असत) तेथे त्यांची कबर केली व तिथेच त्यांना दफन केले. त्यानंतर तिथे त्यांचा दर्गा उभारण्यात आला. सध्या असलेल्याडोंगरी पोलीस ठाण्याच्या बाजूला टेकडी होती. बाबा त्या टेकडीवरच्या झाडाखाली एका शिळेवर बसायचे व नमाज पडायचे. त्यांनी देह सोडल्यानंतर १९२३ साली डोंगरी पोलीस ठाणे वाढविण्यासाठी टेकडी फोडण्याचे काम सुरू झाले. सर्व टेकडी फुटली पण बाबा बसायचे ती जागा फुटत नव्हती म्हणून अनेक सुरूंग लावले. तरीही ती शिळा न फुटता त्यातून रक्त येऊ लागले. ते रक्त तपासणीसाठी पाठवले असता ते मानवी रक्त असल्याचे निदर्शनास आले. ज्यावेळी पोलीस आयुक्तांनी बाबांच्या दर्ग्यावर जाऊन क्षमा मागितली तेव्हा ते रक्त येणे थांबले. त्याच्या खुणा अजूनही तशाच आहेत. त्यानंतर तेथे भिंत बांधून ते ठिकाण पवित्र स्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
दर्ग्याला उर्दु तारीख १ जमादिन अव्वल रोजी दरवर्षी १० दिवस बाबांचा उरुस (जत्रा) भरते. या दिवसांत सतत संदल मिरवणूका निघतात. पाचव्या दिवशी डोंगरी पोलीस ठाणे येथील बाबांच्या बैठकीला संदल मिरवणूकीचा मान आहे. त्यावेळी कव्वाली कार्यक्रम होतात. दहाव्या दिवशी समारोप कार्यक्रम होतो. बाबांचा भंडारा (नियाज) गोरगरीब व भक्तांना वाटप केला जातो. बाबांच्या भक्तांमध्ये मुस्लिम तसेच हिंदूही भक्त बरेच होते व अजूनही आहेत. बाबा देहरूपाने असताना जितके चमत्कार त्यांनी दाखविले तितकेच चमत्कार त्यांनी देह सोडल्यानंतरही घडत आहेत. बाबांची कृपादृष्टीही भक्तांना लाभत आहे व निरंतर ती लाभत राहील.